|
|

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेला केंद्राकडून निधी - जयंत पाटील मंगळवार, ९ मार्च, २०१०
एकात्मिक कमी खर्चाच्या स्वच्छता योजनेसाठी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेला केंद्र शासनाने ५ कोटी ४९ लाख ९३ हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
केंद्र शासनाच्या नागरी दारिद्र्य निर्मुलन विभागाने सर्वात जास्त लाभार्थ्यांची संख्या असलेला व सर्वाधिक रकमेचा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा राज्यातील एकमेव प्रस्ताव मंजूर केला आहे. सांगली शहराचा कायापालट करण्यासाठी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने विविध विकास कामांना गती दिली असल्याचे सांगून श्री.पाटील म्हणाले की, महापालिकेच्यावतीने एकात्मिक कमी खर्चाच्या स्वच्छता योजनेचा प्रकल्प अहवाल २९ जून २००९ रोजी शासनाकडे पाठविण्यात आला होता. राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने तसेच हुडको या नोडल एजन्सीच्या मुंबईतील विभागीय कार्यालयाने या प्रकल्प अहवालास मंजुरी देऊन तो शिफारसीसह अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे २३ ऑक्टोबर २००९ रोजी पाठवला होता. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्यास मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील ७४ वॉर्डमधील दारिद्र्य रेषेखालील ४ हजार ७८२ व्यक्तींना लाभ मिळणार आहे. योजनेमध्ये प्रती शौचालय १० हजार बांधकाम खर्च अपेक्षित असून योजनेत केंद्र शासनाचा हिस्सा ७५ टक्के , राज्य शासनाचा हिस्सा १५ टक्के आणि लाभार्थ्यांचा हिस्सा १० टक्के राहणार आहे.
'इको व्हिलेज' सारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात करताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या मुलभूत नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे असल्याचे श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
|
|